नागपूर (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करून सीबीआयला सहा महिने झाले. सीबीआयने सुशातसिंह राजपूत प्रकरणाचा तपास केला. सुशांतसिंह याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली, यासंबंधीचा चौकशी अहवाल सीबीआयनं जाहीर करावा, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी येथे केली.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या की हत्या हे सीबीआयनं स्पष्ट करावं असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय. नागपूर येथे एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलंय. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, “सुशांत सिंह केसमध्ये सीबीआयला तपास देऊन चार ते पाच महिने झाले. त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे लोकांना जाणून घ्यायचं आहे. सीबीआयनं लवकरात लवकर या केसच्या बाबतीतला तपासाचा अहवाल जनतेसमोर ठेवावा. राज्याचा गृहमंत्री म्हणून मला सतत लोक हेच विचारतात.” अनिल देशमुखांनी या प्रकरणी सीबीआयवर निशाणा साधत पुढं म्हटलं की, “महाराष्ट्रातले लोक तसेच महाराष्ट्राबाहेरचे लोक अतिशय उत्सुकतेनं सीबीआयच्या या तपासाची वाट बघताहेत की कधी एकदा सीबीआयचा तपास समोर येतो. त्यामुळं ही आत्महत्या होती की त्याची हत्या करण्यात आली याबद्दलचं सत्य जनतेसमोर येईल. आज गृहमंत्री म्हणून लोक मला सातत्यानं विचारतात की या केसचं काय झालं. त्यामुळं सीबीआयनं याचा लवकरात लवकर खुलासा करावा.”
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतनं १४ जून रोजी वांद्रे येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी लिखित स्वरूपात काहीच न सापडल्यानं त्याच्या आत्महत्येमागील नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्यानं जीवन संपवल्याचे म्हटले जात आहे. बॉलिवूडमध्ये ठरवून काम दिलं जात नसल्याच्या कारणामुळं तो तणावाखाली होता. नेमक्या कोणत्या कारणामुळं सुशांत तणावाखाली होता, हे शोधण्यासाठी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. सुशांतला ओळखणाऱ्या, त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचे जबाब घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. परंतु सुशांतची आत्महत्या नसून त्याची हत्या झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानतंर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयला सोपवण्यात आला.
















