मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व चाकण इंडस्ट्रीज असोसिएशन (CIA) यांचे प्रतिनिधीसोबत झालेल्या आढावा बैठकीत करारनाम्याचे प्रारूप अंतिम करण्यात आले. त्यानुसार चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील १९ गावांचे पाणीपुरवठा योजनेबाबत नियमानुसार तत्काळ कार्यवाही करावी असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
चाकण औद्योगिक वसाहत व पुणे जिल्हयातील खेड तालुक्यातील १९ गावांचे पाणीपुरवठा योजनाबाबत आढावा बैठक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मंत्री पाटील म्हणाले, या योजनेच्या औद्योगिक क्षेत्रातील पाणी पुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत करणेत येत असला तरी पाणीपट्टी वसुली, चाकण इंडस्ट्रीज असोसिएशन (CIA) मार्फत करणेत येते. योजनेचे संकल्पित वर्ष हे २०२१ असून लाभार्थी गाव ही औद्योगिक क्षेत्रात येत असल्याने सदर गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच औद्योगिकरणामुळे पाण्याचा वापरही वाढत आहे. या योजनेचा संकल्पन कालावधी पूर्ण झाला असल्याने सुधारीत योजनेनुसार समाविष्ट गावांना सध्याचा लोकसंख्येचा दाखला व योजनेत समाविष्ट होण्यास इच्छुक असलेबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव सादर करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. ही माहिती संबंधित ग्रामपंचायतीकडून प्राप्त झाल्यानंतर सुधारीत योजनेबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. या बैठकीस आमदार दिलीप दत्तात्रय मोहीते पाटील, अधिक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सुभाष भुजबळ, अधिक्षक अभियंता प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता महेश वासुदेव पाटील आदी उपस्थित होते.