अफगाणिस्तान (वृत्तसंस्था) तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर इतर देशांसोबतचे संबंध बदलू लागले आहेत. रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केल्यानंतर तालिबानने भारतासोबत सर्व प्रकारची आयात आणि निर्यात रोखली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशनचे महासंचालक डॉक्टर अजय सहाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने पाकिस्तानच्या हवाई मार्गाने होणारी कार्गो वाहतूक थांबवली आहे.
डॉ. अजय सहाई यांनी सांगितलं की, तालिबानने यावेळी सर्व मालवाहतूक बंद केली आहे. आपला माल अनेकदा पाकिस्तानातून पुरवला जात होता, जो आता बंद झाला आहे. आम्ही अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, जेणेकरून आम्ही पुरवठा सुरू करू शकू. पण सध्या तालिबानने निर्यात-आयात बंद केली आहे.
डॉ. अजय सहाई यांच्यानुसार, व्यवसायाच्या बाबतीत भारत हा अफगाणिस्तानचा सर्वात मोठा भागीदार आहे. २०२१ मध्येच आपल्या देशातील निर्यात ८३५ मिलियन डॉलर होती. तर ५१० मिलियन डॉलरची आयात होती. आयात-निर्यातीव्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. ज्यामध्ये सुमारे ४०० योजनांमध्ये ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.
सुकामेवा महागणार
अफगाणिस्तानातील अस्थिरतेमुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता असल्याने भारतात सुकामेवा महागण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सुकामेव्याच्या मिठायांच्या किमतीही वाढणार आहेत. अफगाणिस्तानातून प्रामुख्याने जर्दाळू, अंजीर, छोटे पिस्ते आणि अक्रोडचा पुरवठा भारतासह इतर देशांना होतो.