मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात ३ दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. टोपेंच्या विधानावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला टोला लगावला आहे. राज्यातील मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्र सरकारशी संवाद साधावा. देशात सर्वाधिक लशीचा पुरवठा महाराष्ट्रालाच केला जात आहे.
“राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते कोरोना लसीकरणासंदर्भात करत असलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. राज्याच्या लसीकरण क्षमतेनुसारच टार्गेट ग्रूपला आवश्यक इतक्या लशींचा पुरवठा केंद्राकडून केला जात आहे. केंद्र सरकारकडून सर्वाधिक लसी महाराष्ट्रालाच दिल्या जात आहेत. भारत सरकार काही वेगळं आहे का? त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्र्यांनी या गोष्टी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्राशी चर्चा करावी. माध्यमांमध्ये बोलायचं आणि हात झटकायचं हे आधी बंद झालं पाहिजे”, असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.
राज्यात सातही दिवस १०० टक्के लॉकडाऊन असल्याचं चित्र आहे. विकेंडला दोन दिवस लॉकडाऊन आणि पाच दिवस कडक निर्बंध असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण प्रत्यक्षात सर्वच बंद करुन ठेवलं आहे. यामुळे राज्यातील लहान उद्योजक, छोटे व्यापारी आणि नागरिकांचा उद्रेक होईल याची काळजी सरकारनं घ्यावी, असा सल्ला फडणवीस यांनी दिला आहे.
रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा
राज्यात अनेक शहरातील रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरु असल्याचा आरोप केला जातोय. त्याबाबतही फडणवीसांनी सरकारला आवाहन केलं. राज्य सरकारनं रेमडेसिवीरबाबत तत्काळ कारवाई करायला हवी. इंजेक्शनचा काळाबाजार रोखला पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी राज्य सरकारकडे केलीय.
तीन दिवसांनी लसीकरण ठप्प होईल : आरोग्यमंत्री
“महाराष्ट्रात १४ लाख लसींचे डोस शिल्लक असून हा साठा केवळ तीन दिवस पुरेल अशी भीती व्यक्त करताना राजेश टोपे यांनी दर आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. महाराष्ट्रात लसीचे १४ लाख डोस शिल्लक असून ही तीन दिवसांपुरता साठा आहे. पाच लाखांच्या तुलनेत हे डोस तीन दिवसांत संपेल आणि महाराष्ट्रातील लसीकरण बंद होऊ शकेल. म्हणूनच दर आठवड्याला किमान ४० लाख लस पुरवठा केला पाहिजे. आज आम्ही साडेचार ते पाच लाखांपर्यंत आहोत. पण दोन दिवसांत दिवसाला सहा लाखांपर्यंत जाण्याची हमी मी देतो.” असंही ते म्हणाले. “केंद्र सरकार लस पाठवत नाही असं नाही पण वेग कमी आहे. ज्या पद्धतीने आव्हानात्मक बोललं जातं त्यापद्धतीने केलं जात नाही हे केंद्र सरकारला सांगणं आहे.” अशी टीकाही राजेश टोपे यांनी केली.