अहमदाबाद (वृत्तसंस्था) देशात काही शहरात पेट्रोलच्या किंमती शंभरी ओलांडण्याच्या मार्गावर आहेत. देशातल्या विरोधी पक्षांनी यावरुन केंद्र सरकारवर प्रचंड टीका केली आहे. अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की आता यावर बोलणं म्हणजे धर्मसंकट आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये इंधन दरवाढीसंदर्भात एक भाष्य केलं आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कधी कमी होतील हे आपल्याला सांगता येणार नाही असं सीतारामन यांनी म्हटलं आहे. तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती या धर्मसंकट असल्याचेही निर्मला यांनी म्हटलं आहे. अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती कधी कमी होणार यासंदर्भातील प्रश्नावर, “मला नाही संगता येणार ‘कधी’.. हे धर्मसंकट आहे,” असं उत्तर दिलं. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने यावर चर्चा करुन मार्ग काढण्याची गरज असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
“यावर केवळ उपकर आकारला जातो असं नाही. केंद्राकडून आकरले जाणारे उत्पादन शुल्क तसेच राज्यांकडून आकारला जाणारा व्हॅटही यामध्ये असतो. त्यामुळे यामधून महसूल मिळतो हे काही लपवण्यासारखी गोष्ट नाही. केवळ मलाच नाही तुम्ही कोणत्याही राज्याला विचारलं तरी यात महसूल आहे असं ते सांगतील,” असंही निर्मला यांनी म्हटलं. या इंधन दरवाढीवर मार्ग काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करावी हा आहे, असंही निर्मला यांनी म्हटलं. “यासंदर्भात काहीतरी करणं गरजेचे आहे हे मला मान्य आहे. आम्हाला काय करणं शक्य आहे पाहुयात,” असंही निर्मला यांनी ग्राहकांना अधिक पैसे द्यावे लागू नयेत असं मत मांडताना म्हटलं आहे.
त्या आधी देशातल्या वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर भाष्य करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले होते की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी पेट्रोल आणि डिझेलवरचे कर कमी करावेत. केंद्राने आणि राज्याने यावर एकत्र बसून तोडगा काढावा असाही सल्ला त्यांनी दिला आहे.