जळगाव ( प्रतिनिधी ) – भारतीय हवामान विभाग यांच्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील आठवडाभर उष्णतेची तीव्रता कायम राहणार असून तापमान ३९ ते ४० अंश – सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. ११ ते १६ एप्रिल या कालावधीत आकाश पूर्णपणे स्वच्छ राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
११ आणि १२ एप्रिल रोजी कमाल तापमान ३९ अंशांपर्यंत पोहोचेल, तर १३ ते १६ एप्रिलदरम्यान तापमान ४० अंशांच्या आसपास स्थिर राहणार आहे. – यामुळे दुपारच्या वेळेत उकाडा अधिक – तीव्र जाणवण्याची शक्यता असून नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.
संपूर्ण आठवडाभर सतत वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका नाकारता येत नाही. विशेषतः शेतकरी, बांधकाम कामगार आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि आरोग्य तज्ञांनी नागरिकांना भरपूर पाणी पिणे, दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळणे, हलके कपडे परिधान करणे आणि उन्हात दीर्घकाळ राहणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
अत्यंत उष्णतेच्या परिस्थितीत कामगार, मजूर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार, रोजंदारी मजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना उष्माघाताचा अधिक धोका असतो. त्यामुळे जिल्ह्यातील नियोक्ता, उद्योग, बांधकाम कंपन्या तसेच ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तातडीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. याशिवाय सर्व संबंधित विभाग, उद्योग व स्थानिक संस्था यांना समन्वयाने काम करून या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
वैशाली चव्हाण,
निवासी उपजिल्हाधिकारी
















