सांगली (वृत्तसंस्था) नातीचा वाढदिवस साजरा करून तासगावच्या दिशेने परत येत असताना तासगाव- मणेराजुरी महामार्गावर चिंचणी हद्दीत चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने तासगाव शहरात शोककळा पसरली आहे.
अपघातात गाडीतील राजेंद्र जगन्नाथ पाटील (५६), त्यांच्या पत्नी सुजाता जगन्नाथ पाटील (५२ रा. तासगाव), मुलगी प्रियंका अवधूत खराडे (३३), नात दुर्वा अवधूत खराडे (५), दुसरी नात कार्तिकी अवधूत खराडे (१, सर्व रा. बुधगाव) आणि राजवी विकास भोसले (२, रा. कोकळे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर पाटील यांची दुसरी मुलगी स्वप्नाली विकास भोसले ही गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तासगाव येथील अभियंता राजेंद्र पाटील हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत चारचाकीतून (एमएच-१०-एएन-१४९७) कोकळे (ता. कवठेमहांकाळ) येथे नातीच्या वाढदिवसासाठी गेले होते. वाढदिवस संपल्यानंतर नात आणि लेकीसह माघारी तासगावला जाण्यासाठी ते निघाले. तासगाव जवळ आल्यानंतर तासगाव ते मणेराजुरी महामार्गावर असलेल्या ताकारी योजनेच्या कालव्याजवळ चालक राजेंद्र पाटील यांचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे गाडी कालव्यात कोसळली. या अपघातात सहाजण ठार झाले.
अपघात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला असला तरी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परिसरातील ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर याची कल्पना तासगाव पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांच्यासह तासगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी स्वप्नाली भोसले यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. राजवीचा दुसरा वाढदिवस तिच्या कुटुंबीयांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. मात्र वाढदिवस संपवून सुट्टीसाठी आजोबांसमवेत आजोळी जात असतानाच काळाने तिच्यावर घाला घातला. त्यामुळे राजवीचा हा अखेरचा वाढदिवस ठरला असून पाटील कुटुंबीयांसाठी मंगळवारची रात्र काळरात्र ठरली.