पुणे (वृत्तसंस्था) राज्यात परीक्षा घोटाळा (TET exam scam) प्रकरणात आणखी एक धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. टीईटी परीक्षेत आपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2018 मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली. 2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 592 परीक्षार्थींना पात्र करण्यात आले. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थी हे अपात्र ठरल्याचं समोर आलं आहे. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हे धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे पाच अधिकारी सायबर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन मदत करत आहेत. तुकाराम सुपे आणि सहकाऱ्यांच्या कॉम्प्युटर्समधून मिळालेली माहिती, वेगवेगळ्या एजंट्सकडून मिळालेली माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या माहितीशी पडताळून पाहिल्यावर सायबर पोलीस या निष्कर्षांपर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान, जळगाव, भडगावसह यावल व पारोळा तालुक्यातील काही एजंटाकरवी या गैरव्यवहाराला मोठी चालना देण्यात आली होती. चौकशीनंतर तपासाची दिशा त्यांच्यादिशेने असेल, हे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जी.ए. सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रीतीश देशमुख याच्याबरोबर सुरंजित गुलाब पाटील (वय ५०, रा. उत्तरानगर, नाशिक), स्वप्निल तीरसिंग पाटील (रा. शिक्षक कॉलनी, चाळीसगाव, जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर टीईटी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली होती. पोलिसांनी सुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत लाखोंचा मुद्देमाल आढळला होता. यानंतर आता पोलिसांनी सुपे यांच्या घरी आणखी एक धाड टाकली आहे. यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. छापेमारीत आरोपी सुपे याच्या घरात पोलिसांना दोन कोटीहून अधिक रुपयांची रक्कम आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आढळले होते.