नागपूर (वृत्तसंस्था) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना बदलण्याचे उद्धव ठाकरेंचे मनसुबे असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. काहीही झालं तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदललं जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा दूर करावा
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने भाजपाला नाकारलं. तर नव्हे, जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं. त्यामुळे हे बेईमानीने तयार झालेलं सरकार आहे. आतातरी उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा बाजूला सारुन सांगावं की त्यांना मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा होती आणि ती पूर्ण केली. दिलेला शब्दच जर पूर्ण करायचा होता तर इतर कोणा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं. सुभाष देसाई, दिवाकर रावते होते. मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा नव्हती तर नारायण राणे, राज ठाकरेंना का बाहेर जावं लागलं? मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय, म्हणजे नक्की काय करायचंय? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही. तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हात पाय तोडून त्याला फासावर लटकवायचा असा महाराष्ट्र घडवायचा आहे का? आमच्यात जोवर रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील”.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच बदलण्याचे मनसुबे
फडणवीस पुढे म्हणाले, “काल माननीय मुख्यमंत्र्यांनी संघराज्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आणि ही व्यवस्था बदलली पाहिजे असं सांगितलं. म्हणजे काय? भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच बदलण्याचे मनसुबे त्यांनी काल बोलून दाखवले. काहीही झालं तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे बदललं जाणार नाही, ते कोणी बदलू शकणार नाही. त्यामुळे हे संविधान बदलण्याचे छुपे अजेंडे, काही कम्युनिस्ट लोकांना सोबत घेऊन आणि तशाच डाव्या विचारांच्या काही पक्षांच्या सोबतीने हा जो मनसुबा तुम्ही रचताय, तो आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाही”.