मुंबई (वृत्तसंस्था) बॉलीवूड आणि टीव्ही जगतासाठी आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. अनेक चित्रपटांबरोबरच टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अनुपम श्याम यांचे निधन झाले आहे. ते ६३ वर्षांचे होते.
समोर आलेल्या माहितीनुसार आजारी असतानाच अनुपम हे स्टार भारतच्या प्रतिज्ञा या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाच्या चित्रकरणामध्ये सहभागी झाले होते. मुंबईमधील लाइफ लाइन रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. रविवारी रात्री आठच्या सुमारास त्यांची प्रकृती फारच खालावली आणि मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांचा मृत्यू झाला. दिग्दर्शक अर्जुन पंडित आणि अभिनेता मनोज जोशी यांनी अनुपम यांना सोशल नेटवर्किंगवरुन श्रद्धांजली अर्पण केलीय.
अनुपम यांनी दस्तक, हजार चौरासी की मां, दुश्मन, सत्या, दिल से, जख्म, संघर्ष, लगान, नायक, शक्ति, पाप, जिज्ञासा, राज, वेलडन, अब्बा, वॉन्टेड, कजरारे और मुन्ना माइकल सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. प्रतिज्ञा या मालिकेमुळे अनुपम घराघरात पोहचले. या मालिकेत त्यांनी ठाकुर सज्जन सिंह ही भूमिका साकारली होती. या भूमिकेचा एवढा प्रभाव मालिकांवर पडला की नंतर अशी भूमिका अनेक मालिकांमध्ये दिसून आली. अनुपम यांच्या निधनानंतर सोशल नेटवर्किंगबरोबरच मनोरंजन क्षेत्रामध्येही शोक व्यक्त केला जात आहे.