जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाच राज्यांच्या निवडणूक निकालावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपकडे राज्याचे नेतृत्त्व करणारा चेहरा नव्हता. म्हणूनच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात जनमताचा कौल हा ममता बॅनर्जी यांच्या बाजूने आला आहे, असं मत ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
अजिंठा शासकीय विश्रामगृहात आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक आणि महाराष्ट्रातील पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावर त्यांनी आपले मत मांडले.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, “पश्चिम बंगालमधील जनतेने राज्यात कोण नेतृत्त्व करू शकतो, जनतेच्या कामांसाठी कोण पुढे येऊ शकतो, याचा विचार करूनच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे ममता दीदींच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपला थेट केंद्रातून सर्व प्रकारची रसद पुरवली गेली. पण त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्त्व करणारा चेहरा नसल्यानेच ममता दीदींच्या बाजूने जनमताचा कौल गेला असे मला वाटते. कोणत्याही राज्याचा नागरिक केंद्राच्या वेळी वेगळ्या पद्धतीने मतदान करतो. राज्याच्या वेळी तो वेगळ्या पद्धतीने करतो. ममता दीदींनी राज्याचे नेतृत्त्व करावे, हे पश्चिम बंगालमधील लोकांच्या मनात पक्के होते. हे सिद्ध झाले आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, “पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन मोदींचा करिष्मा ओसरला का यापेक्षा राज्याचा विकास कोण करू शकतो, मातीशी कोण जुळला आहे, याचा विचार मतदारांनी केला. मोदींकडे जे लोक गेले होते, ते ममता दीदींचेच अपत्य होते. त्यामुळे लोकांनी ‘लाश वही है, बस कफन बदल गया है’, अशा प्रकारची हुशारी दाखवली. लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली आहे”
पश्चिम बंगालमधील २९२ जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत, ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवल्याचं चित्र आहे. दुपारी १ पर्यंतच्या आकडेवारीनुसार तृणमूल काँग्रेसने २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली. तर भाजपला ७५ च्या आसपास जागांवर आघाडी घेता आली. बहुमतासाठी बंगालमध्ये १४७ जागांची गरज आहे.
















