नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काही दिवसांपासून चार लाखांचा टप्पा पार करणारी कोरोनाची आकडेवारी आज कमी आली असून गेल्या २४ तासांत देशात ३ लाख २९ हजार ९४२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३८७६ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिवसभरातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. आकडेवारीनुसार देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असली, तरी मृत्यूंचं प्रमाण मात्र काळजी वाढवणारं आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख २९ हजार ९४२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मोठा दिलासा देणारी बाब म्हणजे ३ लाख ५६ हजार ८२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
देशात रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी मृत्यूचं प्रमाण वाढलं असून, ते कायम आहे. गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस देशात दिवसाला चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती. हा आकडा काही प्रमाणात कमी झाला असला, तरी सरासरी कायम आहे. देशात गेल्या २४ तासांत तीन हजार ८७६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण करोनाबळींची संख्या दोन लाख ४९ हजार ९९२ वर पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील स्थिती
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लावलेल्या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम झाला असल्याचं मागील काही दिवसांच्या रुग्णांच्या आकडेवारीवरुन समोर आलं आहे. सोमवारी राज्यात ६१,६०७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर नवीन ३७,३२६ रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच ५४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जवळपास महिन्याभरानंतर कोरोना रुग्णांचा एका दिवसातला आकडा ४० हजारांच्या खाली आला आहे.