मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारने दुकानांवर मोठ्या अक्षरात मराठी पाट्या बंधनकारक केल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेतला आहे. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात २००८-०९ मध्ये महाराष्ट्र सैनिकांनी दुकानाच्या पाट्या मराठीत करण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी अंगावर केसेस घेतल्या आहेत. मराठी पाट्यांचे श्रेय फक्त मनसेचे आहे. ते लाटण्याचा आचरटपणा कोणी करु नये असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरे म्हणाले की, या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला. आंदोलनं केली. शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. सरकारने आता हा निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन, बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये, त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच असं त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
तसेच महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन, सरकारला मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा. ह्यात आणखी एक भानगड सरकारनं करुन ठेवली आहे की, मराठी भाषेसोबतच इतर भाषा नामफलकांवर चालतील. ह्याची काय गरज आहे? महाराष्ट्राची भाषा देवनागरीतील मराठी आहे. देवनागरी लिपी सर्वांना समजते. इथे फक्त मराठीच चालणार आणि ह्याची आठवण पुन्हा आम्हाला करायला लावू नका असा गर्भित इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.