जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यानंतर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, बुधवारी जिल्ह्यात सुमारे तीन हजार इंजेक्शन प्राप्त होतील, अशी ग्वाही अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी माजीमंत्री एकनाथराव खडसेंना दिली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असून ही दुसरी लाट पहिल्या टप्प्यातील लाटेपेक्षा अधिक तीव्र आहे. त्यामुळे महिनाभरातच सक्रिय रुग्णांची संख्या दहापटीने वाढून ती १० हजारांवर पोचली आहे. यातील बहुतांश रुग्णांना कोरोनावर उपयुक्त ठरणारे रेमडेसीवीर इंजेक्शनची गरज भासत असून त्याची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण होऊन काळा बाजारही वाढला आहे.
खडसे, जगवानींनकडून प्रयत्न
या स्थितीत इंजेक्शनअभावी अनेक रुग्णांना जीवही गमवावा लागत असून जिल्ह्यात भीषण स्थिती निर्माण झाल्याने माजी मंत्री खडसेंनी याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे स्थानिक निरीक्षक डॉ. अनिल माणिकराव यांच्याशी चर्चा करुन माहिती जाणून घेतली. या इंजेक्शनसाठी लागणारा कच्चा माल आयात होतो, त्यात अडचणी आल्याने उत्पादनावर मर्यादा आल्या. त्यामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती समोर आली. या इंजेक्शनसाठीचा कच्चा माल प्राप्त झाला असून आठवडाभरात उत्पादन व पुरवठा पूर्ववत सुरळीत होईल, अशी माहिती मिळाली.
चर्चेनंतर शिगणेंची ग्वाही
यासंदर्भात खडसे व डॉ. जगवानी यांनी राजेंद्र शिंगणे यांच्याशी चर्चा केली. उत्पादन व पुरवठा होत नाही, तोवर जिल्ह्यातील नागरिकांचे बळी जाऊ द्यायचे काय? असा प्रश्न करत एकनाथराव खडसेंनी मंत्र्यांना रेमडेसीवीरच्या पुरवठ्याबाबत विनंती केली. त्यावर बुधवारी जिल्ह्यात रेमडेसीवीरच्या तीन हजार व्हायल्स पुरविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच १२ एप्रिलनंतर रुग्णांसाठी पुरेल एवढा साठा सुरळीत होईल, असेही सांगण्यात आले.