इस्लामपूर (वृत्तसंस्था) नवविवाहित दाम्पत्यावर काळानं घाला घातला आणि त्यांच्या सुखी संसाराची स्वप्न भंग झाली आहे. नुकतंच लग्न झालेल्या या नवविवाहित दाम्पत्य देव दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात घडला. इंद्रजित मोहन ढमणगे (वय २८) व कल्याणी ढमणगे (वय २६, दोघेही रा. किसाननगर इस्लामपूर, ता. वाळवा), अशी मृतांची नावे आहेत. अपघातात इंद्रजित यांचे वडील मोहन व आई गंगव्वा हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
या संदर्भात अधिक असे की, इस्लामपूर येथील अभियंता इंद्रजित मोहन ढमणगे यांचा विवाह इचलकरंजी येथील प्रकाश उरणे यांची कन्या ॲड. कल्याणी यांच्याशी १८ मार्चला झाला होता. नवविवाहित दाम्पत्य शुक्रवारी ३१ मार्चला सकाळी इस्लामपूर येथून कर्नाटकातील बनशंकरी देवीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी मृत इंद्रजित यांचे आई- वडीलही सोबत होते.
शनिवारी ढमणगे कुटुंबाने देवीचे दर्शन घेतले. तेथून घरी परत येताना हल्लूर गावाजवळ एका टँकरने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. त्यात इंद्रजित आणि कल्याणी हे दाम्पत्य ठार झाले. इंद्रजितचे आई- वडील जखमी झाले. या अपघाता एकुलता एक मुलगा गेल्याने ढमणगे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, नवविवाहित दाम्पत्याचा नवा संसार सुरू होण्याआधीच काळानं घाला घातल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.