मुंबई (वृत्तसंस्था) परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे संसदेतही चांगलाच गदारोळ पाहायला मिळाळा. भाजपासह इतरही काही पक्षांच्या खासदारांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आता भाजपावर जोरदार टीका केली आहे. तसेच “मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत” असं म्हणत त्यांनी फडणवीसांना सणसणीत टोला लगावला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रुग्णालामध्ये दिलेल्या ‘प्रेस बाईट’चे व्हिडिओ ट्विट करून विरोधी पक्षनेत्यांनी जो केविलवाणा प्रयत्न केला यातून त्यांच्या मनात ‘मी पुन्हा येईन’चे स्वप्न अजूनही जिवंत असल्याचे प्रतीत होते आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंतच्या घडामोडी, महाविकास आघाडी सरकारवरील आरोपांची मालिका बघता नेमकं काय होतंय, कशासाठी होतंय आणि कोण करतंय याचा अंदाज प्रत्येकाला नक्कीच आला असेल, असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत.
गृहमंत्र्यांना क्वारंटाईन होण्यास सांगितले असताना त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. पण त्यांनी विरोधी पक्षनेत्यांनी ४ नोव्हेंबर २०२० रोजी दवाखान्यातून डिस्चार्ज घेतानाचे ट्विट केलेले फोटो बघावेत आणि मग आपल्या आक्षेपाचा विचार करावा. दरम्यान, अनैतिक मार्गांने सरकार पाडणं शक्य होत नसल्याने बेछूट आरोप करून सरकारविषयी जनतेच्या मनातली आपलेपणाची भावना नाहीशी करण्याचा विरोधी पक्षाचा नेहमीच प्रयत्न राहिलाय. आरोप असतील तर चौकशी होऊन सत्य समोर येईलच, परंतु सत्तेसाठी कुठल्या थराला जायचं याचा विचार मात्र विरोधकांनी करावा, असे रोहित पवार म्हणाले.
महाराष्ट्राच्या हक्कांवर गदा येत असताना जे कधी एक शब्दही बोलले नाहीत ते आज महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेत आक्रमक झालेले दिसले. केवळ राजकीय पतंग न उडवता महाराष्ट्राच्या हिताचं काम केलं तर महाराष्ट्र नक्कीच आपला अभिमान बाळगेल, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. तर दुसरीकडे संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी, राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स, काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी या गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिले, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
















