जळगाव (प्रतिनिधी) मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचा अटकपूर्व जामीन आज औरंगाबाद हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता बकालेंचे बचावाचे सर्व दरवाजे हळू-हळू बंद होत आहेत. बकालेंना सेवेतून बडतर्फ केल्याशिवाय शांत बसणार नाही. अगदी बकालेंच्या अटकेसाठी विशेष पथक नेमावे, या आशयाचे पत्र लवकरच मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना देणार असल्याची माहिती चाळीसगाव भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
आ. चव्हाण पुढे म्हणाले की, या प्रकरणात सर्व कायदेशीर बाबींवर लक्ष आहे. बकाले यांचे निलंबन झाले असले तरी आमची मागणी ही त्यांना बडतर्फ करण्याची आहे. त्यामुळे या प्रकरणात मी स्वतः बारकाईने लक्ष घालून आहे. अगदी त्यांना जामीन मिळू नये म्हणून हायकोर्टचं नव्हे तर, सुप्रीम कोर्टापर्यंत आमचा लढा सुरु राहील. अगदी अगदी बकालेंच्या अटकेसाठी विशेष पथक नेमावे, या आशयाचे पत्र लवकरच मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना देणार असल्याचेही आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर आज औरंगाबाद न्यायालयाने बकालेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याआधी जळगाव जिल्हा न्यायालयानेही बकालेचा अर्ज फेटाळून लावला होता. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.