भुसावळ (प्रतिनिधी) येथील प्रभाग क्र. १४ व १७ मध्ये विज वितरण कंपनीच्या वतीने वारंवार मिटर बदलविण्यात येत आहे. शिवाय घरात लावलेले मिटर विज खांबावर लावण्याची मोहिम विज कंपनीने हाती घेतली असतांना परिसरातील नागरिकांनी कंपनीच्या या मोहिमेला विरोध करत मिटर बदलविण्याची प्रक्रिया बंद पाडण्यात आली.
दरम्यान, वारंवार मिटर बलविण्याच्या घोळाची चौकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केल आहे. माहितीनुसार, शहरातील या भागात ५० टक्के विजेचा शॉर्ट येत असून परिसरात विजचोरी होत असल्याचा संशय विज कंपनीला आहे. त्यामुळे यापूर्वी या परिसरातील मिटर बदलविण्यात आले होते. त्यावेळी मिटर बदलविण्यासाठी कुठलाही खर्च न देण्याचे कंपनीकडून सांगण्यात आले असतांनाही कंपनीच्या ठेकेदारांकडून मिटर बसविण्यासाठी पैसे उकळण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा या प्रभागातील मिटर बदलविण्यात येत असून विजेच्या खांबावर परिसरातील नागरिकांची मीटर लावण्यात येत आहे. त्यामुळे या प्रभागांमधील मिटर वारंवार का बदलविण्यात येतात. आणखी किती वेळा मिटर बदलणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करत विज कंपनीची ही मोहिम बंद पाडली.
यावेळी प्रभागातील नगरसेवक आशिक खान, शेर खान व सचिन पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांची जी तक्रार होती त्या बाबतीत सांगण्यात आले आहे. तसेच विज वितरण कंपनीचे विभागीय उपअभियंता जी. टी. महाजन व कनिष्ठ अभियंता तुषार हिंगणे यांनी घटनास्थळी दाखल होत नागरिकांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी शहरातील सर्वच प्रभागात प्रभाग निहाय ही मोहिम सुरु करण्याचे सांगितले. अधिकार्यांच्या समजुतीनंतर ही नागरिकांनी मिटर बदलविण्याची मोहिम बंद पाडली. दरम्यान, प्रभागातील संतप्त नागरिकांकडून याबाबत विजकंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे या प्रकाराबाबत तक्रार करण्यात येणार असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.