चोपडा (प्रतिनिधी) आदिवासी प्रकल्प विभाग अंतर्गत येणाऱ्या येथील शासकीय मुला,मुलींचे वस्तीगृहात येणाऱ्या विविध समस्यांना वाचा फोडत आज दि.२ रोजी सकाळी ११ वाजता चोपडा येथील शासकीय विश्राम गृहापासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मागण्या मान्य होण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवातही करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य असून निवडणूका झाल्यानंतर महिन्याभरात सोडवू असे, आश्वासन प्रांताधिकारी एकनाथ बंगाडे यांनी दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले. यावल प्रकल्प अधिकारी व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून प्रांताधिकारी बंगाडे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली.
आदिवासी मुलांच्या मागण्यात आदिवासी वसतिगृहात मुलांची क्षमता १००० कोटा करावा,आदिवासी मुलांसाठी शासकीय वसतिगृह इमारत लवकर बांधावी,शासकीय माध्य.विद्यालय दाहिवद येथील मुख्याध्यापक शिरसाठ यांनी आदिवासी मुलांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल व्हावा,२०१८ – १९ ची शिष्यवृत्ती तात्काळ मिळावी, सन २०१५ पासून आदिवासी वसतिगृह इमारती साठी जागा मिळाली आहे,पण ती ताब्यात नाही, त्यावर अतिक्रमण आहे, आदी मागण्यासाठी उपोषण करण्यात आले.
प्रकल्प कार्यलयाचा वतीने सहा.प्रकल्प अधिकारी वसतिगृह विजय गाढे,वरिष्ठ शिक्षण अधिकारी मीनाक्षी सुलताने ह्या हजर होत्या. यावेळी डॉ.चंद्रकांत बारेला,ऍड.दारासिंग पावरा, ऍड.जामसिंग बारेला,रज्जाक तडवी, यांनी उपोषणस्थळी भेट देवून चर्चा केली.सर्व मागण्या लवकरच पूर्ण करू असे लेखी आश्वासन मिळाल्याने आमरण उपोषण तात्पुरते थांबवण्यात आले..मोर्चाचे नेतृत्व जेक्राम बारेला,स्वप्नील बारेला नामसिंग पावरा,वानासिंग बारेला,वसंत पावरा, राहुल बारेला,अर्जुन वारेला ,दिलीप पावरा,केदार बारेला,आकाश पावरा,भाईदास पावरा यांनी केले..