नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर होणारी महत्वपूर्ण सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. घटनापीठातील न्यायमूर्ती कृष्ण मुरारी हे उपलब्ध नसल्याने आज सुनावणी होऊ शकणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने नोटीसद्वारे स्पष्ट केले आहे.
16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्याबाबत सुप्रीम कोर्टात सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यीय घटनात्मक पीठापुढे ही सुनावणी होणार होती. या सुनावणीचे वेळापत्रक आज ठरणार होते. त्यानुसार, वेळापत्रक समोर आले आहे. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती कृष्ण मुरारी सुट्टीवर असल्याने सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. आता पुन्हा केव्हा सुनावणी होणार हे अद्याप अस्पष्ट आहे.
मागील काही महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षाचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढं ही सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीत घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितले होते. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पक्षकारांना तीन आठवड्यांची मुदत देऊ केली होती. दरम्यान, या सुनावणीसाठी पुढील कोणती तारीख मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.