नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात जीवघेण्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मंदावला आहे. गेल्या २४ तासांत ३४ हजार ७०३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत देशात अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत घट होऊन चार लाख ६४ हजार ३५७ वर आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात ३४ हजार ७०३ नवीन रुग्ण आढळून आले असून, ही मागील १११ दिवसांतील निचांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांबरोबरच सर्वसामान्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या निचांकी रुग्णसंख्येबरोबरच देशातील सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्याही घटली आहे. देशात ४ लाख ६४ हजार ३५७ रुग्ण उपचाराधीन आहेत.
डेल्टा प्लस या विषाणूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत असून, हा विषाणू तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशात लसीकरणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत (५ जुलैपर्यंत) भारतात एकूण ३५,७१,०५,४६१ लशीचे डोस देण्यात आले आहेत, ज्यात पहिल्या आणि दुसर्या डोसचा समावेश आहे. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ३१.४४ लाखांपेक्षा जास्त लशीचे डोस दिले गेले आहेत.
राज्यातील परिस्थिती
महाराष्ट्रातील दररोजच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा जवळपास दुप्पट रूग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. राज्यात सोमवारी (५ जुलै) ६ हजार ७४० नवीन कोरोनाबाधित आढळले, तर १३ हजार २७ रूग्ण कोरोनातून बरे झाले. राज्यात ५१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत (५ जुलै) एकूण ५८,६१,७२० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.०२ टक्के झाले आहे. तर, राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे.४
पाच जिल्ह्यात रुग्णसंख्या शुन्यावर
धुळे, नंदुरबार, हिंगोली, भंडारा, नांदेड या पाच जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक १२३४ रुग्णांची नोंद झाली आहे.