अहमदनगर (वृत्तसंस्था) अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर होणार, अशी घोषणा बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अहमदनगरमधील चौंडी येथे आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयेजित कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “आहिल्यादेवी होळकर यांचे नाव हिमालयाएवढे आहे. अहिल्यादेवी यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी खूप काही केलं. अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आहे. आमच्या सरकारच्या काळात अहमदनगरच्या नामांतराचा निर्णय होणार असल्याने हे आमचं भाग्य आहे. तर आहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी दिसली नसती, आहिल्यादेवी यांनी कधीही भेदभाव केला नाही असं सांगत अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तसेच धनगर वाड्यांना जोडण्यासाठी आपण अर्थसंकल्पात रस्त्याची तरतूद केली आहे. 22 वेगवेगळ्या योजनाचा लाभ आपण आपल्या समाजाला उपलब्ध करुन दिला आहे.
दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळात यासंदर्भात मागणी करताना सरकारची यासंदर्भात काय भूमिका आहे असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर यांनी सरकार या नामांतराबाबत सकारात्मक असून यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रस्ताव देखील मागवले आहेत अशी माहिती दिली होती.