मुंबई (वृत्तसंस्था) अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएकडून तपास सुरू आहे. सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर यासंदर्भातील वेगवेगळ्या बातम्या समोर येताना दिसत आहे. त्यावरून राज्याचे जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एनआयएला सल्ला दिला आहे. “सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे यांच्या चौकशीबाबत एनआयएने निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतरच बोलावे. दररोज विनाकारण बातम्या पसरवू नयेत,” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे यांच्या चौकशीबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेने निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतरच बोलावे. दररोज विनाकारण वेगवेगळ्या बातम्या पसरवू नयेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. या सगळ्यामुळे तपास प्रक्रियेविषयी काहीच माहिती नसलेल्या समाजातील लोकांपर्यंत चुकीचा संदेश जातो. त्यामुळे NIA ने प्रथम संपूर्ण तपास पूर्ण करावा. या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागला की अधिकृतपणे सर्वांसमोर येऊन बोलावे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
नारायण राणे यांच्यावरही जयंत पाटील यांनी टीका केली. पाण्याच्या बाहेर असल्यावर माशाची जशी तडफड होते त्याप्रमाणे नारायण राणे यांची अवस्था झाली आहे. नारायण राणे यांना पुन्हा कधी सत्तेत जाऊन बसतो, असे झाले आहे. त्यामुळे काहीही झालं की ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करता. हाच न्याय लावायचा झाल्यास प्रथम उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
यावेळी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून भाजपचे नेते सातत्याने सरकार पडणार, अशा वल्गना करत आहेत. या अधिवेशनात भाजप पहिल्यांदाच विरोधी पक्षाप्रमाणे वागताना दिसला. देवेंद्र फडणवीस यांना खात्री झाली आहे की, आपल्याला पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षातच बसायचे आहे. त्यानुसार त्यांनी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडली. हे त्यांनी नेहमी करावं, विरोधी पक्षात बसण्याची सवय फडणवीसांनी अंगवळणी पाडून घेतली पाहिजे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.