नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सोमवारी भारतातील कोरोना स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली भारतातील परिस्थिती ही अत्यंत वाईट असून हृदय पिळवटून टाकणारी असल्याचं मत जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केलं.
जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत आहेत पण भारतातील परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केलं.
टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितलं की, भारतातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेकडून मदत पुरवण्याचं काम सुरू आहे. ऑक्सिजनच्या पुरवठ्यासोबतच पीपीई किट्स आणि इतर साहित्यांची मदत भारतात देण्यात येत आहे. भारतातील कोरोनाच्या संकटाला नियंत्रित आणण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे दोन हजारहून जास्त कर्मचारी भारतात काम करत असल्याचं तसेच भारतातील लसीकरणाच्या कार्यक्रमात मदत करत असल्याचं टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितलं. तसेच जगभरातील इतरही अनेक देशांनी भारताला मदत द्यायला सुरुवात केली आहे.
दरम्यान टेड्रोस यांनी जगातील कोरोना रुग्णसंख्या सलग ननव्या दिवशी वाढण्यावरुन चिंता व्यक्त केली. पाच महिन्यात जितके रुग्ण आढळले होते तितक्या रुग्णांची गेल्या एका आठवड्यात नोंद झाली असल्याचं सांगत त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य सांगितलं. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून भारत चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र भारतात वेगाने होणारी रुग्णवाढ चिंतेचा विषय ठरत असून जागतिक रुग्णसंख्येत मोठा वाटा उचलत आहे.