मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा कार्यकाळ अखेर संपला आहे. त्यांच्या जागी आता नियोजन विभाग अतिरिक्त मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती यांची निवड करण्यात आली आहे. सिताराम कुंटे यांनी देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे पदाभार सोपवला आहे.
सीताराम कुंटे यांना तीन महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे सादर केला होता. मात्र, केंद्राकडून राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. संध्याकाळपर्यंत राज्य सरकारचा प्रस्ताव मंजूर करण्यात न आल्यानं अखेर कुंटे यांना निवृत्त व्हावं लागलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला नव्या मुख्य सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुंटे यांच्या जागी आता नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीताराम कुंटे यांच्यावरील विश्वास पुन्हा एकदा दिसून आलाय. कारण, मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले आहेत.