जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची तीव्र स्वरूपाची लाट असल्याचं पाहायला मिळत असून आज 43.5 इतक्या उच्च तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढणार आहे.
वाढत्या उन्हामुळे गेल्या दोन दिवसापूर्वी एकाचा उष्मा घाताने मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. सध्या असलेले उन्हाची लाट अजून काही दिवस अशीच कायम राहिली तर अजूनही उष्मा घाताचे बळी वाढू शकणार असल्याची शक्यता आहे. एप्रिल आणि मे महिन्यात काय होणार असा विचार करून लोकांची चिंता वाढली आहे. मात्र डॉक्टरांनी याबाबत लोकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. उन्हात बाहेर निघण्याचं टाळावे, शरीराला पाण्याची कमी होऊ देऊ नये, खूप पाणी प्यावे, त्यासाठी ज्यूस, नारळपाणी, ताक यासारखे पदार्थ घ्यावे.
2-3 दिवसात कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ
दरम्यान पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढणार आहे. पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही ठिकाणी तर विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कमाल तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होणार आहे. अहमदनगर, जळगावमध्ये उष्णतेच्या लाटेच्या अंदाजासोबतच सोलापूर, जालना, परभणी आणि हिंगोलीत देखील उष्मघाताची शक्यता आहे.