जळगाव (प्रतिनिधी) बीएचआरमधील आमच्या हक्काचे पैसे भेटतील याची आशा आम्ही सोडून दिली होती. कारण पैशाअभावी पत्नीचा उपचार करू शकलो नाही. मुलीचे लग्न देखील कर्ज काढून केले. परंतू तुम्ही केलेल्या कारवाईमुळे पैसे परत मिळतील, अशी एक आशा निर्माण झाली आहे. आता उतारवयात विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे आमच्या हक्काचे पैसे मिळवून द्या, अशी भावनिक साद एका वृद्ध ठेवीदाराने पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपयुक्त भाग्यश्री नवटके यांना घातली आहे. सोपान म्हातारबा सानप (वय ६७ वर्ष, रा.पटेल कॉलनी, येवला, जि. नाशिक) यांनी एक पत्र आज नवटके मॅडमांना पाठवले आहे.
सोपान म्हातारबा सानप (वय वर्षे ६७, रा.पटेल कॉलनी, येवला ता. येवला, जि. नाशिक) यांनी नवटक्के मॅडमांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाईचंद हिराचंद मल्टीस्टेट को ऑप सोसा लि. जळगाव येथे अवसायक श्री जितेंद्र कंडारे यांनी सांगितल्यानुसार श्री. सोपान म्हातारबा सानप रु. ६४१०८३ कै. शोभा सोपान सानप रु.४५४२२८ श्री. प्रशांत सोपान सानप रु.३९५५२८ सौ. स्मिता सोपान सानप रु. ११५१३३ च्या ओरीजनल ठेव पावत्या जमा केल्या आहेत.
कोणत्याही सरकारी निमसरकारी को. ऑपरेटीव्ह अथवा मल्टीस्टेट संस्थाना कायद्यात ओरीजनल पावत्या ठेवून घेवून पैसे द्यावेत असे कुठेही नमुद नाही. श्री कंडारे यांनी ओरीजनल पावत्या ठेवून घेवून मला फक १ लाख दिलेले आहेत ठेव पावत्यांच्या झेरॉक्स कॉपी सोबत जोडत आहे.
याबाबत मी मा. श्री. नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार यांचेकडे पैसे मिळणे बाबत अर्ज केला होता त्या अर्जाची प्रत सोबत जोडत आहे. तसेच मे.कंज्यूमर कोर्टात देखील दावा दाखल केला होता. त्या दाव्याची नोटीस सोबत जोडत आहे. सन २०१५ पासुन वारंवार सतत पैशाची मागणी करत आहे. परंतु समक्ष भेटुनही उपयोग होत नव्हता. नेहमी श्री. कंडारे (अवसायक) उडवाउडवीची उत्तरे देत होते कोणत्याही अर्जाचे त्यांनी उत्तर दिलेले नाही कदाचित अवसायक पदास पंतप्रधानापेक्षा मोठी पोस्ट समजत असावे.
आपणाकडून केल्या कार्यवाहीची अनेक वृत्तपत्रात बातमी वाचली आहे. आपण केलेल्या कार्यामुळे माझे पैसे मला परत मिळतील अशी आशा वाटत आहे. माझा आपणांवर पूर्ण विश्वास आहे. माझे वय ६७ वर्षाच्या पुढे आहे तसेच बी.पी. गुडघ्याचे आजार वयोमानानुसार होणाऱ्या विविध आजारांनी ग्रस्त आहे. पत्नीच्या आजारपणात वैद्यकिय सेवेसाठी पैसे वेळोवेळी मागणी करून देखील पैसे न दिल्यामुळे माझा पत्नीचा उपचार करु शकलो नाही. त्यामुळे तिचे निधन झाले. तसेच मुलीच्या लग्नाला देखील पैसे मागितले तरी पण पैसे दिले नाहीत व मी कर्ज काढुन मुलीचे लग्न केले. तरी आपण कर्जदारांवर गुन्हे दाखल करून कारवाई करून वसुली झाल्यावर प्रथम ज्येष्ठ नागरिकाचे मृत्युदर लक्षात घेवून त्याचे प्रथम प्राधान्याने पैसे मिळवून द्यावे, ही विनंती !