मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. कारण ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड सध्या अनुकूल नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला आहे. या परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशापद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान या परीक्षा ऑफलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या परीक्षा ऑनलाईन होणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे.
दहावी, बारावीची परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे. राज्यात सध्या दहावीचे १६ लाख, तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी आहे.
कसं आहे वेळापत्रक?
महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर केलं. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होईल. बारावीची बोर्डाची परीक्षा २३ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक देण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षी १२ वीची परीक्षा २३ एप्रिलपासून सुरू होईल तर २१ मे रोजी १२ वीचा शेवटचा पेपर असेल, तर १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे या कालावधीमध्ये घेतली जाईल. १० वीच्या परिक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि १२ वी च्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे.
कोविड १९ च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.