मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर खोचक शब्दांत टीका केली आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधक वादळ निर्माण करणार, यामध्ये काहीही तथ्य नाही. महाराष्ट्रात वादळ हे अडीच वर्षांपूर्वी आलं होतं, त्यामध्ये सगळेच झोपले, ते अजून उठलेच नाहीत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
विरोधक साधी फुंकर मारतात पण त्यांना वादळ आल्यासारखं वाटतं. पण महाविकासआघाडीची १७० आमदारांची ताकद कायम आहे. त्यामुळे अधिवेशनात वादळ वगैरे येणार नाही. ठाकरे सरकारला साधा ओरखडाही उठणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील समस्यांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सभागृहात आदळआपट करून प्रश्न सुटणार नाहीत. आम्ही लोकशाही मानतो. लोकसभा आणि राज्यसभेत लोकशाही नसली तर महाराष्ट्राच्या विधिमंडळाला एक परंपरा आहे. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. आगामी काळात उद्धव ठाकरे आणखी सक्रिय होत महाराष्ट्रभर फिरतील, असेही त्यांनी म्हटले.
तसेच संजय राऊत यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही टोला लगावला. चंद्रकांत पाटील अनेकदा म्हणतात की, अमुकतमुक व्यक्तीला काय किंमत आहे. पण माझा सवाल आहे की, चंद्रकांत पाटील यांना भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काय किंमत उरली आहे. मला चंद्रकांत पाटील यांची दया येते, त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते, असेही राऊत यांनी म्हटले.