जळगाव (प्रतिनिधी) तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. म्हणून रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे, असे खडे बोल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना सुनावत बच्चू कडू यांची बाजू घेतली आहे.
आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या वादावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रवी राणा यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखं आहे. कोणी विकावू नाहीए. पण तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाही, तर ही गोष्ट चुकीची होईल आणि लोकांमध्ये सभ्रम निर्माण होईल. ४० वर्षांचं करियर लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रवी राणा यांना आवर घालावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करतो, असेही ना. पाटील म्हणाले. तसेच सुरक्षा काढण्यावरून कुणी राजकारण करत नसतो. एखाद्या नेत्याची सुरक्षा काढल्याने कुणाला काही आनंद होत नसतो. सुरक्षे संदर्भात एक समिती काम करते, त्यानुसार तो निर्णय होतो. या समितीने घेतलेल्या आढावानुसारच सुरक्षा करण्यात येते. कोणत्याही नेत्याची सुरक्षा काढण्यामध्ये सरकारला स्वारस्य नाही, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.