मुंबई (वृत्तसंस्था) सरकारनं एक प्रकारची दडपशाही सुरू केलीय. लाल किल्ल्यावर जे शेतकरी घुसले, असं म्हणतायत. ते खरोखर शेतकरी होते का असा प्रश्न निर्माण होतोय. लाल किल्यावर शेतकरी नव्हते फूस लावून काही जणांना पाठवण्यात आले होते. ते आता कुठे फरार झाले आहेत, कुठे गायब झाले आहेत, त्याचा आधी तपास करावा, असं संजय राऊत म्हणालेत. उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलाताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर आज गंभीर आरोप केला.
दिल्लीत शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं सर्वच स्तरांतून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दिल्लीतल्या आंदोलनात महाराष्ट्रातल्या शेतकरी महिलेचाही मृत्यू झाल्यानं राज्यातही खळबळ उडालीय. त्यावरच आता शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. यावेळी संजय राऊत म्हणाले, “सरकारने एकप्रकारची दडपशाही सुरू केलेली आहे. लाल किल्ल्यावर शेतकरी घुसले असं म्हणत आहेत. ते खरोखर शेतकरी होते? की कुणीतरी फूस लावून, जे आता फोटो आलेले आहेत, त्यात ते पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर आहेत. जे सिद्धू वगैरे लोक आहेत, ते कोण आहेत, कोणाचे आहेत. त्याचा तपास आधी करा. ते कुठे गायब झालेले आहेत, पण सरकारला यापुढे शेतकऱ्यांना चिरडून टाकायचंय. दडपशाही करायची आहे. त्याचाच एक कारस्थानाचा भाग म्हणून आंदोलनामध्ये फूट पाडून त्यातील एक गट जो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आंदोलन घुसला होता, असा आरोपही संजय राऊत यांनी केलीय.
ते लाल किल्ल्यावर गेले होते. त्यांनी हडकम माजवला. आज आंदोलनात फूट पडल्याचं चित्र निर्माण करण्यात आलंय. काही नेत्यांवरती गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांना बघून घेऊ, पाहून घेऊची भाषा पोलिसांकडून सुरू आहे. अधिवेशन सुरू होत आहे, पहिल्या दिवसापासून सरकारला या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील, असंही संजय राऊतांनी भाजपला ठणकावून सांगितलंय.