मुंबई (वृत्तसंस्था) अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखात्याची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान नवनिर्वाचित गृहमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सध्याचा काळ अत्यंत अवघड आणि चॅलेंजिंग आहे. परंतु, गृहमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचं काम करेन, असं सांगतानाच प्रशासकिय कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाही राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
पोलीस दलामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकारी असून ते निष्ठा बाळगून काम करत असल्याबाबत दिलीप वळसे-पाटील यांना विचारण्यात आलं. “कुणाची निष्ठा काय आहे, कुणावर आहे हे येत्या काळात तपासून पाहिलं जाईल. योग्य ती माहिती घेतली जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल”, असं दिलीप-वळसे पाटील म्हणाले.
मुंबई हायकोर्टानं परमबीर सिंग प्रकरणी दिलेल्या सीबीआय चौकशीच्या निकालाला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची महत्वाची माहिती देखील यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. यासोबतच कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार सीबीआय असो किंवा एएनआय असो सर्व यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केलं जाईल, असंही ते म्हणाले.
गृहमंत्रिपदी आता नवा वसुली मंत्री कोण? अशी भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेबाबत बोलताना दिलीप वळसे-पाटील यांनी कुणी काय आरोप करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा माझा प्रयत्न आहे, असं म्हटलं. येत्या काही दिवसांत सचिव अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
















