जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी कृषी संदर्भात माहिती दिली आहे. यंदा कपाशीची लागवड अधिक होणार असल्याने २७ लाखापेक्षा अधिक पाकिटे बियाणे जिल्ह्यात येतील. जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ४८२ मेट्रीक टन खतांचा साठा उपलब्ध आहेत. शिवाय ११ हजार ६८२ मेट्रीक टन खतांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे. यावर्षी जिल्ह्यात बी-बियाणे, खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही.
पूर्वी मे महिन्यातच अनेक बागायतदार कपाशीची पेरणी करीत. मात्र गेल्या काही वर्षापासून गुलाबी बोंड अळीच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना बियाणे मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळते. यामुळे बागायतदारांची पंचाईत झाली आहे. तरीही बियाणे येईल तेव्हा पेरू. आतातर शेत पेरणी योग्य करण्याच्या उद्देशाने शेतातील काडीकचरा वेचणे, धस, पळकाट्या जाळणे, बांधावरील तण काढणे, अशी कामे सुरू करीत आहेत. शेत स्वच्छ करून पेरणी योग्य करण्याच्या कामास वेग आला आहे.
जिल्ह्यात २०२२ – २३ या वर्षात मनरेगाअंतर्गत ३३० एकर तर इतर योजनेअंतर्गत १३० अशा एकूण ४६० एकरात तुतीची म्हणजे रेशीमची लागवड होणार आहे. यासाठी २ कोटी ३७ लाख खर्च येणार आहे. यातून १६ हजार ८८० क्विंटल कोष उत्पादनाचा अंदाज असून उत्पादन सुमारे ८० कोटी ८८ लाख रुपयांचे अपेक्षित आहे.