अमळनेर (प्रतिनिधी) सध्याच्या सरकारमध्ये तुझ्यापेक्षा मी मोठा ही जणू काही स्पर्धा सुरू झाली आहे. सध्याच्या शिंदे सरकारने देशात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात देऊन देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केलाय. नंतर या बातमीमुळे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले. दुसऱ्या दिवशी त्यांनी सारवा सारव करत नवीन जाहिरात टाकली. पण त्या जाहिरातीमध्ये शिंदे सरकारच्या मंत्र्यांचे फोटो होते आणि तेही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सरकार अजूनही त्यांना पाठीशी घालत आहे, म्हणून हे सरकार तर जाहिरातीचे सरकार आहे. सध्याचे सरकार सत्तेसाठी लाचार म्हणून एकत्र आले असल्याची घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्ष ते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. ते अमळनेरला आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या घरी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, सध्याचे सरकार फक्त प्रशासन बदल्या करताना दिसत आहे. चांगल्या अधिकाऱ्यांना याचा फटका बसत आहे. सध्या बेरोजगारी आणि महागाईने जनता त्रस्त झालेली आहे. राज्यातील कारखाने दुसऱ्या राज्यात निघून गेली आहेत. हे सरकारचे अपयश आहे. परराज्यात व्यवसाय गेले याची सरकारला पडलेली नाही. अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, कांदा उत्पादन करणारा शेतकरीला काहीच मिळाले नाही. त्यांचा खर्चही निघाला नाही त्यांना कोणतीही मदत या सरकारने दिली नाही अजून सरकार म्हणतोय शासन आपल्या दारी यातून काही साध्य होणार नाही. ग्रामीण भागात विजेची समस्या ही नियमित झाली असून शेतकरी त्रस्त झाले आहेत.
शिंदे सरकार म्हणते 10 तास विज देणार पण मिळाली नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांना ट्रान्सफोर्मेर मिळत नाही. सध्या महाराष्ट्रात जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करून दंगली घडवल्या जात आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीसांचा दरारा राहीलेला नाही. शासनाचा हस्तक्षेप वाढला आहे. सध्याचे सरकार सत्तेसाठी लाचार म्हणून एकत्र आले आहेत. सरकारने जाहिरातीवर करोडो रूपायाचा खर्च केला आहे.
पाच मंत्र्यांवर भष्टाचाराचा आरोप असूनही कारवाई नाही. शेतकरी, तरुण वर्ग नाराज आहे. दोन हजार रुपयाची नोट बंद करून त्या नोटा आरबीआयकडे आल्या नाही, सध्या कुठे गेल्या?, हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे. चांगल्या कामासाठी देशाच्या भल्यासाठी आम्ही सहन करायला तयार आहोत. पण आता सहनशीलता संपली आहे. मागे किती काळापैसा बाहेर आला ते सांगा, सरकारकडे त्याचे उत्तर नाही.
संजय राऊत धमकी प्रकरणी सत्ताधारी खोटी धमकी असल्याचा आरोप करत आहे. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, योग्य तपास करून कारवाई झाली पाहिजे. गरीबाची मूले शिक्षणापासून वंचित राहू नये. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना समानता या तत्त्वानुसार जुनी पेंशनचा प्रश्न, सरकारने त्यावर निर्णय घ्यावा, अभ्यास समिती नेमली आहे तिचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा. पाडळसरे धरणाला जास्तीत निधी द्यावा. आमच्या सरकारने मोठा निधी दिला होता शिंदे सरकारनेही धरणाचे काम बंद न करता जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा.
प्रत्येक राज्याने दोनपेक्षा अधिक अपत्याचा कायदा आणावा. तर समान नागरी कायदा यावर पवार म्हणाले की, गरीबावर अन्याय होता कामा नये. या विषयावर चर्चा करुन निर्णय झाला पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटप बाबत वाद होणार नाहीत. सामोचाराने प्रश्न सोडवणार असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. ज्या पक्षाची ताकद जिथे असेल तिथे त्या पक्षाचा उमेदवार दिला जाईल. त्यामुळे सध्या मीडियामधील उलट सुलट बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही असेही त्यांनी सांगितले. देशात मोदींमुळे भाजप सत्तेत आहे. जसे राजीव गांधी, इंदिरा गांधीमुळे सत्तेत काँग्रेस सरकार होते हे विसरून चालणार नाही. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी सडेतोड उत्तरे दिली. यावेळी माजी आमदार सतीश पाटील, दिलीप वाघ,कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.