मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर संयुक्त किसान मोर्चाने घेतलेल्या भूमिकेवर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भूमिका मांडली आहे. तसेच रोज शब्दांचे बुडबुडे फोडत राहिले की, गांभीर्य कमी होते. लोकांचा विश्वासही राहत नाही. मोदींच्या बाबतीत नेमकं तेच घडताना दिसत आहे, हे बरे नाही. असा शब्दांत शिवसेनेनं भाजप व मोदींवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
काय म्हटलंय सामना अग्रलेखात ?
तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली खरी, पण शेतकरी आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत. मोदी यांनी घोषणा केली, पण त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. जोपर्यंत संसदेत ठराव करून हे कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे संयुक्त किसान मोर्चाचे नेते सांगतात,” असं शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
संसदेचे अधिवेशन २९ तारखेला सुरू होत आहे. किसान मोर्चाने आधी जाहीर केले होते की, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ५०० शेतकरी ट्रक्टरसह दिल्लीत धडक मारतील, हे आंदोलन सुरूच राहील. याचा अर्थ असा की, देशाच्या पंतप्रधानांचा शब्द मानायला शेतकरी तयार नाहीत. शेतकऱ्यांचा पंतप्रधानांवर विश्वास नाही. पंतप्रधान बोलतात तसे करतीलच याची खात्री नाही. पंतप्रधानांकडे लोकसभेत बहुमत आहे, पण लोकांचा विश्वास गमावला आहे. हे चित्र चांगले नाही,” अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय.
लोकसभेत बहुमताच्या बळावर मंजूर केलेले कायदे बाहेर लोकांनी झिडकारले तरीही पंतप्रधान लोकांचे ऐकायला तयार नव्हते. शेवटी लोकांचा रेटा असा वाढला की, त्यांना कायदे मागे घ्यावे लागले. मोदी यांचे मन किती मोठे आहे, अशा थाळ्या आता वाजवल्या जात आहेत, पण या काळात ७०० शेतकऱ्यांनी प्राण गमावले. हे काही मोठ्या किंवा दिलदार मनाचे लक्षण नाही. म्हणूनच शेतकरी आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत,” असंही या लेखात म्हटलं आहे.
“शेतकरी म्हणतात, कायदे संसदेतच मागे घेतले पाहिजेत व तेच बरोबर आहे. दीड वर्षातील काळात असंख्य शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले, ते मागे घ्यावेत ही मागणी आहे, पण पिकांच्या आधारभूत किमतीचा विषयही शेतकरी नेत्यांनी लावून धरला आहे. शेतकऱ्यांची भूमिका अशी दिसते की, आता नाही तर कधीच नाही. पंजाब-हरयाणाचा शेतकरी ईरेला पेटला की काय करू शकतो हे या आंदोलनाने जगाला दाखवून दिले. पंजाबच्या शेतकऱ्यांना अतिरेकी, खलिस्तानवादी म्हणून हिणवले तरी त्यांनी संयम सोडला नाही, हे विशेष,” असं म्हणत आंदोलक शेतकऱ्यांचं कौतुक केलं आहे.
महाराष्ट्र असो की देशातील इतर राज्ये, भाजपाचे सर्वत्र फक्त भडकविण्याचेच प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी बाधले नाहीत, हे महत्त्वाचे. राकेश टिकैत, बलवीर सिंह, जालिंदरसिंह विर्क हे नेते ठाम राहिले. कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांविरुद्ध देशातील शेतकरी वर्गात घाणेरडा प्रचार करूनही मोदी सरकारच्या हाती काहीच लागले नाही. पंजाबचा शेतकरी रस्त्यावर उतरला व मजबुतीने उभा राहिला म्हणून तीन काळे कृषी कायदे रद्द करावे लागले. ते पूर्ण रद्दीत जात नाहीत तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत. लोकांच्या दबावापुढे अनेकदा झुकावे लागते, पण हा रेटा आणि लोकभावना वेगळीच आहे. पंतप्रधान रोज शब्दांचे बुडबुडे फोडत राहिले की, गांभीर्य कमी होते. लोकांचा विश्वासही राहत नाही. मोदी यांच्या बाबतीत नेमके तेच घडताना दिसत आहे, हे बरे नाही,” असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला आहे.