बीड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील लवुळ या गावात मागील काही दिवसांपूर्वी तीन मोठ-मोठ्या वानरांनी धुडगुस घातला होता. कुत्र्यांच्या छोट्या पिल्लांना उचलून नेत उंचावरून त्यांना खाली जमिनीवर फेकून देईल त्यांना ठार करत. परिणामी गावातील कुत्र्यांच्या पिलांची संख्या कमी झाल्यानंतर वानरांनी लहान मुलांना टार्गेट केले होते. दरम्यान नागपूरच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अवघ्या काही तासातच तीन वानरांपैकी दोघांना जेरबंद केले.
लवुळ येथे तीन वानरांची दहशत होती.धारूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन नागपूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. त्यानुसार शनिवारी पहाटे पाच वाजता नागपूर वनविभागाचे अधिकारी गावात दाखल झाले. दोन ठिकाणी पिंजरे लावून त्यात श्वानाचे पिलू सोडण्यात आले. प्रथम एक वानर केवळ अर्ध्या तासात पिंजऱ्यात अडकले, तर दुसरे वानर एका तासानंतर पिंजऱ्यात अडकले. यात कुत्र्याचे पिलू घेऊन जाणाऱ्या वानराचाही समावेश होता. या वानरांना खाण्यासाठी कांदे, शेंगा भाकरी आदी ठेवण्यात आले. हे अधिकारी वानराच्या विशिष्ट भाषेत ओरडताच हे वानर जवळ येत असे, तर जवळच असलेल्या कर्मचाऱ्यांवर अनेकवेळा ते धावून गेले. या वानरांनी पिंजऱ्यातील पिलांना पाहून त्याला धरण्याचा प्रयत्न करताच तेच जाळ्यात अडकले. हे दोन वानर पकडल्याचे समजताच गावकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकत आनंद व्यक्त केला. वानराच्या हल्ल्यामध्ये गावातील सात ते आठ लोकांना इजा झाली होती. गावातील कुत्र्यांची संख्या कमी झाल्याने वानरांनी आपला मोर्चा लहान मुलांकडे वळवला होता.