अहमदनगर (वृत्तसंस्था) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उत्तर प्रदेशातील हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. “केवळ हाथरसमधील कायदा व सुव्यवस्था राखणारी माणसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्या आहेत आणि अशा प्रकारच्या निर्घृण कृत्या करणाऱ्यांना त्वरित फाशी देण्यात यावी.” अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक अत्याचार घटनेप्रकरणी अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया प्रेस नोटच्या माध्यमातून दिली आहे. हाथरसमध्ये जी घटना घडली ती मानवतेला कलंक आहे, ही एका मुलीची हत्या नसून संपूर्ण मानवतेची हत्या आहे. असं म्हणत अण्णा हजारेंनी दोषींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी केली आहे. ‘भारताला ऋषीमुनींचा देश बोललं जात, भारताची संस्कृती संपूर्ण जगात श्रेष्ठ संस्कृती असून या देशात मान शरमेने खाली घालवणारं दुष्कृत्य होतं हे ठीक नाही. तसेच सर्वांत दुःखाची बाब म्हणजे ज्यांच्यावर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे तेच लोकं कायदा आणी सुव्यवस्था सांभाळण्यात कमी पडत आहे. हे चिंताजनक बाब आहे. त्यामुळे असं कृत्य करणाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे. जेणेकरून असे कृत्य पुन्हा होऊ नये.’ अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.
उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस निशाण्यावर
पीडित युवतीच्या कुटुंबियांनी उत्तर प्रदेश पोलिसांवरही आरोप केला आहे की त्यांनी वेळीच या प्रकरणी योग्य ती कारवाई केली नाही. हे प्रकरण उजेडात आल्यानंतरही त्यांनी सदर मुलीवर बलात्कार झाल्याच्या माहितीचे खंडन केले होते. तसेच तिची जीभ कापली गेली नसल्याचे आणि तिच्या पाठीचा कणा मोडला नसल्याचे सांगितले होते. पीडितेच्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध रात्री उशिरा पोलिसांनी तिच्यावर जबरदस्तीने अंत्यसंस्कार केल्याचा आरोपही तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या सर्व प्रकारानंतर देशभरातून सरकार आणि पोलिसांवर टीकेची झोड उठत आहे.