मुंबई (वृत्तसंस्था) येत्या काही दिवसांत भाजपमधीलच ‘साडेतीन’ लोकं हे अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख (Anil Deshmukh) हे बाहेर असतील, असे सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे.
आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं, आता आम्ही आरोप करणाऱ्यांना उद्ध्वस्त करु. राज्यात आमचं सरकार आहे आणि त्याचं नेतृत्त्व शिवसेनेकडे आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावं, असेही संजय राऊत यांनी म्हटले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी मंगळवारी शिवसेना भवनात दुपारी चार वाजता आपण पत्रकारपरिषद घेऊ, असे सांगितले. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं उर्जाकेंद्र आहे.
उद्याच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदार हजर असतील. त्यावेळी आम्ही काय बोलू, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागलेले असेल. या पत्रकार परिषदेत आमच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांना आम्ही प्रत्युत्तर देऊ. पुढच्या काही दिवसांमध्ये भाजपचे ‘साडेतीन लोकं’ हे अनिल देशमुख यांच्याच कोठडीत असतील आणि देशमुख हे बाहेर असतील, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला.
जी काही दादागिरी चालली आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरे परिवारावर जो काही आरोपांचा चिखल उडवला जात आहे, त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल. देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत असेल असं काही सांगितलं जात आहे. पण आता देशमुख कोठडीबाहेर असतील आणि भाजपचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील. आय रिपीट, भाजपचे साडेतीन लोकं लवकरच तुरुंगात असतील, असं ते म्हणाले.