टोकयो (वृत्तसंस्था) टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताच्या महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन उपांत्यफेरी अर्थात सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. दिग्गज समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला हॉकी संघावर भारतीय महिला संघाने १-० असा विजय मिळवला.
भारताच्या महिला हॉकी संघाने १९८० साली आपली सर्वोत्तम कामगिरी करत चौथा क्रमांक पटकावला होता, त्यावेळी स्पर्धेत सहा संघ होते. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची भारतीय महिला हॉकी संघाची ही तिसरी वेळ आहे. आतापर्यंत १९८०, २०१६ आणि आता २०२१-२२ या तीन ऑलिम्पिक्समध्ये भारताने प्रवेश केला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला हॉकीमधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना चांगलाच रंगला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला, पण यावेळी त्यांना संधीचे सोने करता आले नाही. दोन्ही संघांनी सामन्याच्या पहिल्या १५ मिनिटांमध्ये गोल करण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आले. भारताने यावेळी उत्तम बचाव केल्याचेही पाहायला मिळाले. कारण ऑस्ट्रेलियाला यावेळी गोल करण्याच्या काही संधी आल्या होत्या, पण भारताच्या उत्तम बचावामुळे त्यांना गोल करता आला नाही. या सामन्यात पहिला गोल केला तो भारतीय संघाने. सामन्याच्या २२ व्या मिनिटाला भारताने गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली होती. भारताच्या गुरजित कौरने हा गोल केला होता.
पहिला गोल झाल्यावर काही वेळातच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कारण भारताच्या मोनिका मलिकला यावेळी ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे तिला मैदानातून बाहेर जावे लागले आणि भारतीय संघावर १० खेळाडूंनिशी खेळण्याची पाळी आली. पण त्यानंतरही सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने १-० अशी आघाडी कायम राखली होती. त्यामुळे यापुढच्या ३० मिनिटांच्या खेळावर भारतीय संघ इतिहास घडणार की नाही, हे अवलंबून होते. तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने गोल करण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण यावेळी भारताचा बचाव उत्तम असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे तिसऱ्या सत्रानंतरही भारताने आपली १-० अशी आघाडी कायम ठेवली होती.