जळगाव (प्रतिनिधी): जैन फार्म फ्रेश फूड्स लि. (जैन इरिगेशन सिस्टीम्सची उपकंपनी) आणि कागोमे इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘टोमॅटो पिक परिसंवाद’ संपन्न झाला. वावडदा-जळके रोडवरील प्रगतशील शेतकरी सुधाकर ओंकार येवले यांच्या शेतात हा कार्यक्रम झाला. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने टोमॅटो उत्पादन वाढवण्यासाठी हा परिसंवाद मार्गदर्शक ठरला.
परिसंवादात टोमॅटो रोपांची योग्य निवड, पूर्व मशागत, ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन, फर्टिगेशन आणि ऑटोमेशन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शास्त्रीय पद्धतीने नियोजन केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळवता येईल, याची प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती देण्यात आली. शासनाच्या विविध अनुदान योजनांबाबतही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष शेतातील प्रात्यक्षिकांमुळे तंत्रज्ञानाची अंमलबजावणी शेतकऱ्यांना अधिक सोपी वाटली.
कार्यक्रमाला कागोमे इंडिया प्रा. लि. जपानचे गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रमुख हेंनरीज शिमुकावा तसेच वरिष्ठ व्यवस्थापक मिलन चौधरी आणि जैन फार्म फ्रेश फूड्स लि. विपणण विभागाचे उपाध्यक्ष रोशन शहा, सुधाकर ओंकार येवले, जळके गावातील कंपनीचे वितरक गजानन ठिबकचे संचालक पी.के. पाटील, गौतम देसर्डा, डी.एम. बऱ्हाटे, व्ही.आर. सोळंकी आणि संदीप जाधव, सागर भोये यांची उपस्थिती होती. करार शेती विभाग प्रमुख करार शेतीच्या माध्यमातून टोमॅटो पिकाचे उत्पादन आणि बाजारपेठेतील स्थिरता वाढवण्यासाठी गौतम देसर्डा यांनी संवाद साधला. विभागीय व्यवस्थापक डी. एम. बऱ्हाटे यांनी तांत्रिक सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. जगभरातील शेतकरी हवामान बदलाच्या समस्येला तोड देत असून त्यावर मात करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, खते व पाण्याचे काटेकोर नियोजन करायला हवे. इतर देशांच्या तुलनेत भारतीय शेतकऱ्यांची उत्पादकता कमी का आहे याबाबतची कारण मिमांसा रोशन शहा यांनी आपल्या भाषणातून केली.
जैन फार्म फ्रेश फूड्स लि. आणि कागोमे इंडिया प्रा. लि. यांचा गेल्या सहा वर्षांपासून जळगाव परिसरात हा संयुक्त उपक्रम शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. याबाबत हेनरीज शिमुकावा यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आयुष्यात टोमॅटो पिकवून अधिक त्यांना घेण्याची संधी शेतकरी यांना असल्याचे सांगून घेतले. त्यांच्या भाषणाचे भाषांतर मिलन चौधरी यांनी केले.
टोमॅटोवर आंतरराष्ट्रीय काम करणाऱ्या कागोमे इंडियाचे भारतात टोमॅटोच्या संशोधन व विकासाबाबत गेल्या १६ वर्षांपासून होणाऱ्या कार्याविषयी मिलन चौधरी यांनी सुसंवाद साधला. फळधारणा वाढ, रोग व्यवस्थापन आणि बाजारपेठेतील मागणी यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन देखील करण्यात आले. सूत्रसंचालन श्रीराम पाटील यांनी तर आभारप्रदर्शन व्ही.आर. सोळंकी यांनी केले.















