नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचं माहिती असतानाही सुविधा निर्माण करण्यात का आल्या नाहीत?, तसंच लसी परदेशात पाठवल्या म्हणूनच आपल्याकडेच तुटवडा जाणवत असल्याचं सांगताना देशवासियांना प्राधान्य का देण्यात आलं नाही? अशी विचारणा काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारला केली आहे.
“आज देशभरातून बेड्स्, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, व्हेंटिलेटरची कमतरता असल्याचे रिपोर्ट येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान आपल्याकडे तयारीसाठी खूप वेळ होता. आपला देश ऑक्सिजनची निर्मिती करणारा सर्वात मोठा देश आहे. मग ऑक्सिजनची कमतरता का जाणवत आहे. कारण त्याची वाहतूक करण्याची सुविधा तयार करण्यात आलेली नाही,” अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.
“तुमच्याकडे आठ ते नऊ महिने होते. दुसरी लाट येणार सांगत असतानाही तुम्ही दुर्लक्ष केलं. युद्धपातळीवर काम करत तुम्ही सुविधा निर्माण करु शकत होता. आज देशात फक्त २००० ट्रक ऑक्सिजनची वाहतूक करु शकतात. देशात ऑक्सिजन आहे, पण जिथे पोहचण्याची गरज आहे पोहोचत नाही,” अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.
“रुग्णलयांमध्ये सुविधा का वाढवली नाही. हे सरकारचं अपयश आहे. आजदेखील ते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. स्टेजवर जाऊन हसत आहेत. देशभरात लोक मदत मागत असताना, रडत असताना तुम्ही हसू कसं शकता,” अशी विचारणा प्रियंका गांधींनी नरेंद्र मोदींना केली. इतकी गर्दी एकत्र येत असताना निवडणूक रॅलींमध्ये जाऊन कोणी चाचणी करतंय का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.