मुंबई (वृत्तसंस्था) भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं रविवारी वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. यानिमित्तानं त्यांना आदरांजली वाहण्याच्या हेतूने मुंबई हायकोर्ट तसेच हायकोर्टाच्या औरंगाबाद, नागपूर व पणजी (गोवा) खंडपीठांमधीलही न्यायालयीन कामकाज सोमवार, ७ फेब्रुवारी रोजी पूर्णपणे बंद राहणार आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्र, गोवा तसेच दादरा-नगर हवेरी, दीव-दमण व सिल्वासा येथील सर्व कनिष्ठ कोर्टांमधील आणि न्यायाधिकरणांमधील कामकाजही बंद राहणार आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या नेतृत्वाखालील मुंबई हायकोर्ट प्रशासकीय समितीने रविवारी रात्री उशिरा याविषयी निर्णय घेतला. ‘हायकोर्ट आणि खंडपीठांमध्ये ७ फेब्रुवारी रोजी न्यायालयीन कामकाज बंद राहील आणि त्या दिवसाचे कामकाज शनिवार, १२ फेब्रुवारी रोजी भरून काढले जाईल. अतितातडीच्या न्यायालयीन प्रकरणांत मंगळवार, ८ फेब्रुवारीपर्यंत थांबणे शक्य नसल्यास संबंधित पक्षकारांनी संबंधित पीठांसमोर ई-मेलद्वारे विनंती पाठवावी. अत्यंत तातडीचे प्रकरण असल्याविषयी समाधान झाल्यास संबंधित न्यायालय त्याचा विचार करेल. ज्या प्रकरणांत अंतरिम आदेश वा दिलाशाची मुदत संपत असेल त्या प्रकरणांत पक्षकारांना ई-मेलद्वारे तातडीचा अर्ज पाठवण्याची मुभा असेल. त्या प्रकरणांची सुनावणी संबंधित न्यायालय मंगळवार, ८ फेब्रुवारी रोजी घेईल. तसेच जी प्रकरणे ७ फेब्रुवारीच्या सुनावणीच्या यादीत होती त्यावर ती-ती न्यायालये ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतील’, असे रजिस्ट्रार जनरल एम. डब्ल्यू. चांदवानी यांनी नोटीसद्वारे स्पष्ट केले. सर्व कनिष्ठ कोर्ट व न्यायाधिकरणांनी या दिवसाचे कामकाज नजीकच्या काळात सुटीच्या एखाद्या दिवशी कामकाज ठेवून भरून काढावे, असे चांदवानी यांनी कनिष्ठ न्यायालयांच्या प्रधान न्यायाधीशांना पाठवलेल्या नोटीसमध्ये स्पष्ट केले.