अहमदनगर (वृत्तसंस्था) भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी नगरच्या सुपे टोलनाक्याजवळ अडवले. त्या शिर्डीला जात असताना पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पुढे जाण्यापासून रोखले. ड्रेसकोडवरुन लावण्यात आलेला फलक हटवण्यावर तृप्ती देसाई ठाम आहेत.
कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली असून तृप्ती देसाई मात्र शिर्डीला जाण्यावर ठाम आहेत. कितीही थांबवले तरी शिर्डीत जाणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांना शिर्डीच्या प्रांताधिकाऱ्यांनी तीन दिवस शिर्डीत प्रवेशबंदी घातली असली तरी तो आदेश धुडकावून शिर्डीत येण्याची तयारी देसाई यांनी केली आहे. तृप्ती देसाई आज सकाळीच शिर्डीसाठी रवाना झाल्या होत्या. दरम्यान, शिर्डी प्रवेशापूर्वीच त्यांना सूपा टोलनाक्या जवळ पोलिसांनी अडवले आहे. तृप्ती देसाई व भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सुपे टोलनाक्याजवळ रोखलं असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. तृप्ती देसाई यांना सुपे पोलिस ठाण्यात नेण्यात आलं आहे. सुपा पोलिस स्टेशनचे प्रवेशद्वार पोलिसांनी केले बंद. माध्यमांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास रोखले आहे. पोलिसांनी अडवल्यानंतर तृप्ती देसाई म्हणाल्या, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पोलिसांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शिर्डीला जाणारच आहोत. लावण्यात आलेला फलक लवकरात लवकर लवकर हटवला जावा, अन्यथा आम्ही आणखी तीव्र लढा उभारु, असा इशारा तृप्ती देसाई दिला आहे.