धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरात सध्या भेडसावत असलेल्या विविध नागरी समस्यांबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने नगरपरिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा करून मुख्याधिकारी झंवर यांना निवेदन सादर केले. यावेळी शहरातील विविध समस्या चर्चेत आणत त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
या निवेदनात पुढील समस्यांचा समावेश करण्यात आला आहे:
टिळक तलावातील केनी वनस्पती नष्ट करून गाळ काढण्याची आवश्यकता, जेणेकरून पाणीस्रोत जिवंत राहतील.
भाटिया गल्लीतील विक्रम ग्रंथालयाजवळ लाईट बसविणे.
रामलीला चौकात कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे समाधान.
शहरातील विविध ठिकाणी पाइपलाइन खोदकामामुळे खराब झालेल्या रस्त्यांचे क्रांक्रीटीकरण.
रामलीला सादरीकरणासाठी महत्त्वाच्या ठिकाणी रस्ता दुरुस्ती.
महात्मा फुले स्मारक परिसरातील ग्रेनाईट व स्टील रेलिंगची गरज.
नेहरू नगर, स्वामी समर्थ केंद्र, रेल्वे हद्द परिसरात नवीन रस्त्यांची कामे.
विद्युत खांबांच्या दुरुस्तीची मागणी.
या शिष्टमंडळात जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहरप्रमुख भागवत चौधरी, उपतालुकाप्रमुख राजेंद्र ठाकरे, रणजित सिंग शिखरवार, भीमाभाऊ धनगर, युवासेना शहरप्रमुख लक्ष्मण माळी, उपशहरप्रमुख रमेश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, आणि यासाठी नगरपरिषद जबाबदार राहील, असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.