नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मुलींच्या लग्नाच्या वयाबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. देशातील मुलींसाठी लग्नाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याबाबतच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुलगी २१ वर्षाची झाल्याशिवाय कोणत्याही पालकांना तिचं लग्न लावून देता येणार नाही.
विद्यमान कायद्यानुसार मुलीच्या लग्नाची वय १८ वर्ष ठरवण्यात आलं आहे. आता हे वय १८ वरून २१ वर्ष करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसा प्रस्तावही कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर केला आहे. आता बालविवाह प्रतिबंधक कायदा, स्पेशल मॅरेज अॅक्ट कायदा आणि हिंदू मॅरेज अॅक्ट कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे.
नीती आयोगामध्ये जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण करण्यात आलेल्या टास्क फोर्सने मुलीच्या लग्नाचं वय वाढवण्याची शिफारस केली होती. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉलही या टास्क फोर्सचे सदस्य होते. त्याशिवाय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महिला आणि बाल विकास, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, साक्षरता मिशन, तसेच न्याय व विधी मंत्रालयाच्या विधेयक विभागाचे सचिव या टास्क फोर्सचे सदस्य होते.
दरम्यान, १५ ऑगस्ट २०२० रोजी लालकिल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याचा उल्लेख केला होता. मुलींचा कुपोषणापासून बचाव करण्यासाठी त्यांचा विवाह योग्यवेळी होण्याची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले होते.