जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आगामी दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. जून-जुलैच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये दुप्पटचा पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असून, सप्टेंबर अखेरपर्यंत ११० टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. विशेष करून मंगळवारी जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव शहर व परिसरात दररोज पावसाची हजेरी लागत असून, सोमवारी देखील जळगाव तालुक्यातील आव्हाणे, खेडी, वडनगरी, ममुराबाद, फुपनगरी, असोदा या परिसरासह जळगाव शहरातदेखील सुमारे अर्धा तास जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पूर्वहंगामी कापसाला मोठा फटका बसला आहे. तसेच सोयाबीन पिकाचा देखील या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.