नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेले काही दिवस फक्त चर्चा सुरू होती. फक्त शक्यता वर्तवली जात होती. भीती व्यक्त केली जात होती. पण, आता अखेर कोरोनाची तिसरी लाट आलीच. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाची तिसरी लाट आल्याची घोषणा केली आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रेयेसस यांनी आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यात आलो आहोत, असं सांगत सर्व देशांना अलर्ट केलं आहे. बुधवारी त्यांनी ही माहिती दिली.
डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले की, व्हायरस सतत बदलत असतो. यासह, तो अधिक संसर्गजन्य होत आहे. ते म्हणाले की, डेल्टा प्रकार आता १११ पेक्षा जास्त देशांपर्यंत पोहोचला आहे. हे लवकरच जगभर पसरेल. व्हायरसचा अल्फा प्रकार १७८ देशांमध्ये, १२३ देशांमध्ये बीटा आणि ७५ देशांमध्ये गॅमा आढळला आहे.
यूबीएस सिक्युरिटीज इंडियाच्या चीफ इकॉनॉमिस्ट तन्वी गुप्ता जैन यांनी म्हटले आहे की, बरीच राज्ये निर्बंध कमी करत आहेत, बाजारपेठा उघडत आहेत, त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका अधिक झाला आहे. देशात लसीकरणाचा वेगही कमी होऊ लागला आहे.
यूबीएसच्या अहवालानुसार, पूर्वी भारतात दररोज सरासरी ४० लाख डोस दिले जात होते. आता ही संख्या 34 लाखांवर आली आहे. ही परिस्थिती यामुळेही धोकादायक आहे कारण आता ४५% प्रकरणे ग्रामीण भागात समोर येत आहेत.
दुसरी लाट संपली नाही, तिसर्या लाटेची चाहूल
तन्वी गुप्ता जैन यांनी बुधवारी सांगितले की, देशातील बहुतेक प्रकरणे २०% जिल्ह्यांमध्ये आढळून येत आहेत. येथे दुसर्या लाटेचा प्रभाव संपलेला नाही आणि तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. ते म्हणाले की आर्थिक पॉईंटर्स सामान्य स्थितीत परत येत आहेत, परंतु तरीही ते मिश्रित परिणाम दर्शवत आहेत. रेल्वे आणि हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याच वेळी, यूबीएस इंडिया अॅक्टिव्हिटी इंडिकेटरनुसार टोल वसुली अजूनही मागील स्तरापेक्षा खाली आहे.
दरम्यान, हेद्राबाद विद्यापीठातील भौतिकशास्त्र तज्ज्ञांनी तिसरी लाट 4 जुलैपासून सुरू झाली असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही दिवसात मृत्युंचा आकडा वाढला असून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे या निष्कर्षावर आल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.