मुंबई (वृत्तसंस्था) वाढत्या कोरोना केसेसमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडलाय. कोरोना रोखण्यासाठी आपल्याला कठोर पाऊल ऊचलावी लागतील असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.
शरद पवार यांनी गुरुवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील कोरोनाची आकडेवारी वाचून दाखवत परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती अतिश्य चिंताजनक आहे. कोरोनाचे हे संकट परतावून लावण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र कष्ट घेत आहे. मात्र, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. मात्र, या निर्बंधांमुळे समाजातील कष्टकरी, व्यापारी, शेतकरी आणि इतर समाज घटकांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना नाशिवंत मालाची विक्री कुठे करायची हा प्रश्न पडला आहे. एकूणच यामुळे सर्वांनाच झळ सोसावी लागत आहे. आपण या सगळ्यातून पुढे जात आहोत. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात यश मिळवायचं असेल तर धैर्याने आणि सामूहिक पद्धतीने या संकटाला सामोरे गेले पाहिजे. त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. कोरोनाचं संकट भीषण आहे. हे वास्तव नाकारून चालणार नाही. आपल्याला एकत्र लढण्याशिवाय पर्याय नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
केंद्र सरकार राज्याला सहकार्य करत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी संपर्क केला. या संकटात संपूर्ण आरोग्य खातं महाराष्ट्राच्या पाठीशी आहे असं त्यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले.