उस्मानाबाद (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तुळजापूरमधील काटगाव येथे पाहणी केल्यानंतर त्यांनी माहिती दिली. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने पुन्हा उभे करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. येत्या दोन दिवसांत मदतीचा निर्णय जाहीर करु, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मी आकडे सांगायला आलेलो नाही, जे करू ते तुमच्या समाधानासाठी करू, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, “मी तुम्हाला नवीन नाही किंवा तुम्ही मला नवीन नाही. तुमच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. या वर्षाची सुरुवात जागतिक संकटाने झाली, वादळ आले आणि जाता जाता पावसाने तडाखा दिला. पुढचे सात-आठ दिवस परतीचा पाऊस कायम असेल. तुम्ही माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहात. सवंग लोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही. मी जे बोलते ते करतो, पण जे करू शकत नाही ते बोलणार नाही. तुम्हाला बरे वाटावे, तुम्ही टाळ्या वाजवाव्यात म्हणून मी आकडा घोषित करायला आलेलो नाही. तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. तुम्हाला जास्तीत जास्त ताकद द्यायला आलो आहे.”
“आज-उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल. तोपर्यंत पंचनामे 80-90 टक्के पूर्ण झाले आहेत. अंदाज आलेला आहे. लवकरात लवकर पूर्ण ताकदीनिशी तुमचे आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. मी आकडे सांगायला आलेलो नाही. ते करु तुमच्या सुख-समाधानासाठी करू. धीर सोडू नका, खचून जाऊ नका. पुन्हा आपले आयुष्य जोमाने सुरू करू यासाठी तुम्हाला दिलासा द्यायला आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला मी येथे आलो आहे. काळजी करू नका, हे तुमचे सरकार आहे. तुम्हाला पूर्ण ताकदीनिशी मदत केल्याशिवाय राहाणार नाही, हे वचन तुम्हाला देतो,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना दिली.