नागपूर (वृत्तसंस्था) मित्रांसोबत रविवारची सुट्टी एन्जॉय करायला हिंगणा तालुक्यातील आलेल्या ६ मित्रांपैकी ५ तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची भयंकर घटना रविवारी सायंकाळी घडली. ऋषिकेश अनिल कराडे ( वय २१ ), राहुल अरुण मेश्राम ( वय २१ ), नितीन नारायण कुंभारे ( वय २१ ), शंतनू अरमरकर ( वय २२) आणि वैभव वैद्य (सर्व राहणार वाठोडा), अशी मृत तरुणांची नावे आहेत. स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने रात्री हिंगणा पोलिसांनी पाचही मृतदेह बाहेर काढले.
वाठोडा परिसरात राहणारे आठ जण रविवारी दुपारी चार आपल्या दुचाकीवरून मोहगाव झिल्पी येथे रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी सर्व मित्र तळ्याच्या काठावर गेले होते. तलावातील पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह झाला. विशेष म्हणजे त्यांना पोहता येत नसतानाही ते तलावात उतरले. हे कृत्य त्यांच्या जीवावर बेतले. चार मित्रांनी तलावात उडी घेतली ते बुडताना पाहून पाचवा मित्र त्यांना वाचवायला गेला व तोही बुडून मृत्यूमुखी पडला. यामध्ये डॉ. प्राजक्त मोरेश्वर लेंडे (३२, रमना मारुती चौक, नागपूर) हे सुदैवाने बचावले.
सुरुवातीला काही काळ सर्व जण तलाव परिसरात फिरले आणि मोबाइलवर फोटोही काढले. त्यानंतर ऋषिकेश, शंतनू, राहुल आणि त्याच्या मित्राला झिल्पी तलावात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. चौघांनाही पोहणे येत नव्हते. सुरुवातीला तलावाच्या काठावर त्यांनी आंघोळ केली. मात्र, ऋषिकेश खोल पाण्यात गेला. तो बुडायला लागला. त्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याला वाचवायला पाठोपाठ अन्य तिघे गेले. मात्र ते देखील बुडायला लागले. त्यामुळे वैभव वैद्य हा त्यांना वाचवायला गेला. तोही बुडाला. एक एक करून पाचही मित्र प्राजक्तच्या समोर बुडाले.
घटनास्थळी सुरु असलेला आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. परंतू तोपर्यंत उशीर झालेला होता. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी रात्री उशिरा पाच जणांचे मृतदेह बाहेर काढले. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.